Showing posts with label दीपस्तंभ. Show all posts
Showing posts with label दीपस्तंभ. Show all posts

Sunday, April 1, 2012

ग्रेस : free but not available!


कवी ग्रेस या माणसाविषयी मला शालेय जीवनात फारसे विशेष आकर्षण असं नव्हतं. शाळेत कधीतरी त्यांची एक कविता होती. इतर कवितांप्रमाणेच त्याही कवितेचा मी अभ्यास केला, त्यावरल्या प्रश्नांची उत्तरं लिहून मार्क्स मिळवलेत एव्हढाच काय या माणसाशी माझा संबंध होता.

मात्र जसंजसं वय वाढत गेलं, तशा माझ्या आकलनाच्या कक्षा काही प्रमाणात तरी विस्तारल्यात. साहित्याशी अधिक जवळून संबंध यायला लागला. आणि तेव्हा ग्रेस हे काहीतरी वेगळंच रसायन आहे हे समजायल लागलं. ग्रेस च्या कवितांचा अर्थ मला शाळेत कळला होता असं मला तेव्हा वाटलं होतं. मात्र मी किती अपूर्ण होतो हे नंतर जाणवायला लागला.

ग्रेस च्या संध्याकाळच्या कविता वाचतांना हा माणूस संध्यामग्न माणसाची लक्षणं घेवूनच जन्माला आलाय हे जाणवायला लागलं. अर्थात मला ग्रेस अजून कळला असं मी म्हणणार नाही. मात्र ग्रेसला मी अनुभवायला लागलो एव्हढं मात्र नक्की. सकाळच्या किंवा दुपारच्या जाणीवेच्या प्रांतातला हा कवी नाही एवढं कळलं. याला समजून घ्यायचा असेल तर नेणिवेच्या प्रांतात जावं लागतं हे जाणवलं. ग्रेस च्या कवितांचा अर्थ शोधात बसलो तर आपण चाचपडतो, अडखळतो. या कविता फक्त अनुभवाच्या असतात. त्यांच्या ओलेपानात मनसोक्त भिजायचं असतं.

ग्रेस ची ओल्या वेळूची बासरी ऐकतांना खूप काही हाती गवसल्यासारखं जाणवतं. दरम्यानच्या काळात जडलेलं दारू, गुटखा यांच व्यसन या माणसाने वाटलं तेव्हा सहजपणे झुगारून दिलं. हा स्वत:च्या प्रतिभेचा आणि निष्ठेचा धनी होता, राजा होता. ग्रेस ला लोक गर्विष्ठ म्हणायचेत. मात्र प्रतिभेचा हा धनी स्वत:शी नेहमीच प्रामाणिक होता आणि त्यामुळे त्याने अशा टीकेकडे कधीच लक्ष दिलं नाही.

ग्रेसला एकदा भेटायचा योग आला. महाविद्यालयातील एका कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून बोलवायला मी ग्रेसला भेटण्यासाठी पुण्यातल्या मंगेशकर रुग्णालयात गेलो होतो. कर्करोगामुळे ग्रेस तिथे होते. शरीर अत्यंत थकलेलं दिसत होतं. परंतु चेहऱ्यावर मात्र खरोखरंच तेज झळाळत होतं. अगदी काही मिनीटचं मी तिथे होतो. ग्रेसनी कार्यक्रमास यायला नकार दिला. परंतु त्या नकाराने खिन्नता येण्याऐवजी मला काहीतरी विलक्षण आनंद मिळाला. काहीतरी वेगळ्याच श्ब्दापलीकडच्या अनुभवाने मी भारून गेलो.

ग्रेसचं मला जाणवलेलं आणि भावलेलं वैशिष्ट्य म्हणजे त्याचा खरेपणा. आयुष्यभर हा माणूस स्वत:च्या जाणीवा आणि नेणीवा यांच्याशी अगदी प्रामाणिक होता. जग काय म्हणतंय याचा त्याने कधीच विचार केला नाही. प्रसिद्धी ही गोष्ट त्याच्यासाठी मिथ्या होती. त्याच्या या खरेपणाला, प्रामाणिकपणाला, मनस्वीत्वाला, संध्यामग्नत्वाला, ‘देहावरची त्वचा आंधळी, सोलून घ्यावी कोणी’ असं म्हणणाऱ्या त्याच्या प्रतिभेला, ओल्या वेळूच्या बासरीतून निनादात राहणाऱ्या ग्रेस नामक संध्यापर्वाला माझा सलाम.  

Sunday, January 15, 2012

मंगेश पाडगावकर- एक सच्चा असामी!

                आयुष्यात काही माणसं अशी भेटतात की आयुष्यभर ती लक्षात राहतात. विशेष म्हणजे जर ही माणसं वलयांकित असतील, प्रसिद्धीच्या झोतातील असतील तर ते आयुष्यावर एक वेगळाच प्रभाव पाडत असतात.

                  नुकताच असाच एक सुंदर अनुभव मला आला. महाविद्यालयाच्या एका कार्यक्रमासाठी मंगेश पाडगावकरांना बोलवायचं ठरलं. माझ्याकडेच सगळी जबाबदारी असल्याने मी स्वत:च त्यांना संपर्क साधला. पाडगावकर म्हणजे साहित्यातील आणि कवितेच्या क्षेत्रातील एक हिमालयाच. एवढ्या मोठ्या व्यक्तीशी बोलतांना एक स्वाभाविक दडपण मनावर असतं.

मात्र आश्चर्य म्हणजे अगदी पहिल्याच फोनवर पाडगावकरांनी येण्याचं मान्य केलं. त्यानंतर एक रात्रभर त्यांच्यासोबत राहण्याचा दुर्मिळ योग आला आणि त्यानिमित्ताने एवढ्या मोठ्या पदावर जावूनदेखील साधेपणा टिकवता येतो याचा प्रत्यय आला.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने कितीतरी वेळ पाडगावकरांच्या सोबत घालवायला मिळाला. मला वाटतं माझ्या आयुष्यातील हे खरंच अगदी अविस्मरणीय क्षण होते. कुसुमाग्रज, पु,ल.देशपांडे, बोरकर अशा कितीतरी लोकांच्या आठवणी त्यांच्या तोंडून ऐकायला मिळाल्यात.

पाडगावकरांच्या स्वभावातला पदोपदी अनुभवायला येणारा गोडवा हासुद्धा खरोखर निराळा आणि विरळाच!
अशी माणसं खरंच खूप काही शिकवून जातात. आणि महत्वाचं म्हणजे एव्हढं मोठं होवूनसुद्धा साधेपणा टिकवता येतो, स्वभावातला गोडवा जपता येतो ही सगळ्यात मोठी शिकवण मिळाली.

पाडगावकरांना, त्यांच्या मोठेपणाला, ८३ व्या वर्षीसुद्धा खणखणीत असणाऱ्या आवाजाला, स्वभावातल्या गोडव्याला, वागण्यातल्या साधेपणाला आणि सहजपणे आपलसं करून टाकणाऱ्या त्यांच्या आपलेपणाला मनस्वी सलाम...!!!






































Sunday, January 1, 2012

निधड्या छातीची माणसं..!!

'अरुण जाखडे' हे नाव किती लोकांना ठावूक आहे मला माहित नाही. पुस्तकांच्या जगात रमणारी माणसं त्यांचं नाव नक्कीच जाणून असतील. 'पद्मगंधा प्रकाशन' या पुस्तक प्रकाशन संस्थेचे ते प्रमुख.

महाविद्यालयात होणाऱ्या एका स्पर्धेच्या संबंधाने त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली आणि या जगात अजूनही सामाजिक भावना जपणारे आणि निस्वार्थी लोक आहेत या गोष्टीवर विश्वास बसला. स्पर्धा मराठी साहित्य या विषयाशी निगडीत असल्यामुळे आम्ही काही मराठी पुस्तक प्रकाशनांकडे गेलो होतो. बऱ्याच ठिकाणी आम्हाला अगदी चांगले दोन शब्ददेखील न ऐकता बाहेर शब्दश: हाकलण्यात आलं. विशेषत: तत्वज्ञान, नैतिकता अशा विषयांची पुस्तके प्रकाशित करणाऱ्या प्रकाशन संस्थांमध्ये हा अनुभव अधिक आला हे विशेष..!! 

दरम्यानच्या काळात 'पद्मगंधा प्रकाशन' संस्थेकडे जाण्याचा योग आला. तेव्हा मुलांचा उपक्रम म्हणून अरुण जाखडे सरांनी तत्काळ मदत करण्याचं मान्य केलं. त्यानंतर बरंच वेळ सरांशी गप्पा मारण्याची संधी मिळाली. तांत्रिक क्षेत्रात सुमारे २० वर्षे काम करत असतांनाच त्यांनी आवड म्हणून प्रकाशन संस्था सुरु केली. आज संस्थेचा विस्तार प्रचंड झाला आहे असंच म्हणावं लागेल. शिवाय जाखडे सर स्वत: उत्तम लेखक असून ते सकाळ इ. वृत्तपत्रांमधून लेखन करत असतात. शिवाय त्यांची स्वलिखित अशी दोन पुस्तकेसुद्धा आहेत. इंग्रजी, हिंदी, मराठी असा वाद न करता जगण्यासाठी निदान एक भाषा लागतेच लागते असं अगदी प्रामाणिक मत जाखडे सर मांडतात.

हा लेख लिहिण्यामागे प्रकाशनाची अथवा एका विशिष्ट व्यक्तीने मदत केली म्हणून त्याची स्तुती करणे असा उद्देश मुळीच नाही. केवळ पद्म्गांधानेच नव्हे तर इतरही अनेकांनी आम्हाला मदत केली आहे. परंतु मदत देतांना कोणत्या भावनेने केली जाते हेसुद्धा महत्वाचे असते. निस्वार्थीपणे मदत करतांना त्यात काहीतरी उपकार आपण समोरच्या व्यक्तीवर करत आहोत असा अविर्भाव त्यात नसावा. बऱ्याचदा मदत करत असतांना भीक देण्याचा अविर्भाव असतो. 

खरं तर एखाद्याला मुक्त हस्ताने आणि मुक्त मनाने मदत करायला सुद्धा खूप सामर्थ्य लागतं. आपल्याकडे जे काही आहे त्यापासून स्वत:ला बांधून न ठेवणं ( detachment ) ही खूप महत्वाची आणि आव्हानात्मक गोष्ट आहे. पण आयुष्यात ज्याला ते जमले तो खरोखर सामर्थ्यवान म्हणायला हवा. आणि मला वाटतं 'अरुण जाखडे' यांच्यासारखी माणसं खरंच निधड्या छातीचीचं आहेत. त्यांना आणि त्यांच्यासारख्या सगळ्यांनाच मनापासून सलाम..!! 

Wednesday, October 19, 2011

पंडित हरिप्रसाद चोरासिया

आयुष्यात सगळं जेव्हा अपुरं वाटायला लागतं तेव्हा संगीत ही कमी भरून काढतं. संगीताची जादू  अनामिक असते. एक आतली अशी ओढ त्यात असते. मात्र  एखाद्या वेड्या, मनस्वी माणसालाच संगीत भारून टाकू शकतं.  सगळ्या गोष्टीत वैचारिक निष्कर्ष काढणाऱ्यांनी संगीत ऐकूच नये. कारण संगीत हे मुक्त, खुल्या मनाचे हुंकार असतात. ते जाणवण्यासाठी आपलं मनसुद्धा तसाच असावं लागतं.

संगीतात बासरीवादन कठीण समजलं जातं. इतिहासात कृष्णाच्या सुरेल बासरीच्या कथा आपण ऐकल्या आहेत. जवळच्या इतिहासात बघितलं तर पन्नालाल घोष यांनी बासरीला नवं परिमाण मिळवून दिलं. एका बांबूच्या तुकड्याने साऱ्या जगाला वेड लावलं.

या सगळ्या संगीतातल्या वाटेमधला एक जादुगार, साधू, वाऱ्याचं संगीत प्रत्यक्ष उतरवणारा योगी म्हणजे पंडित हरिप्रसाद चोरासिया ! नुकतंच महाविद्यालयाच्या मासिकासाठी पंडितजींशी भेटण्याचा दुर्मिळ,सुवर्ण योग आला.

पंडितजींना भेटताना त्यांच्या मोठेपणाचं दडपण होतं. काही काळ गुरुकुलात बसल्यानंतर गाडीतून पंडितजी अचानक आलेत. त्यांच्या वटवृक्षासारख्या व्यक्तिमत्वाने सगळं वातावरण प्रसन्न आणि पवित्रतेने भरून गेलं. पण पंडितजी बोलायला लागलेत आणि मनावरचं सगळं दडपण क्षणात त्यांच्या साधेपणाने आणि तेव्हढ्याच विशाल मनाने बाजूला झालं.

हा आयुष्यातला खूप मौल्यवान क्षण होता. त्यावेळी 'बरखा ऋतू' या कार्यक्रमातील पंडितजींचा मल्हार मला आठवला. त्या दिवशीच्या त्या मल्हारने मी अक्षरश: ओला झालो होतो. ते चिंब भिजणं खूप आनंददायक होतं. पंडितजींसारखा आभाळाला वेड लावणारा, प्राण्या-पक्ष्यांना आपल्याकडे खेचणारा, ऋतुंना अधिक आल्हाददायक बनविणारा साधक खरंच निराळा !